
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि :अन्वर कादरी
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहेत. शिंदे फडणवीस सरकार हे घटनाबाह्य रित्या स्थापन झाल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे, त्यामुळे नैतिकता बाळगून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन पदावरून पायउतार व्हावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर दिली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महाराष्ट्र, देश,शिवसेना व ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्या सर्वांना दिशादर्शक देणारा आहेत. प्रतोद, व्हीप आणि राजकीय पक्षाची भूमिका यावर सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट शिवसेना व ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला असल्याचे दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नैतिक भूमिका म्हणून तत्कालीन परिस्थितीत आपल्या मुलीच्या गुणवत्ता वाढीवरून झालेल्या आरोपावरून राजीनामा दिला होता. तशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे -फडणवीस यांनी ज्या प्रकारे सरकार स्थापनेसाठी पद्धत वापरली ती पूर्ण अयोग्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जर नैतिकता अजून जिवंत असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षावर आज निर्णय दिला आहेत. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी वापरलेल्या पद्धतीला न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहेत. तसेच राज्यपालांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्यच – सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाले की, सन्मानाने पक्षप्रमुखांनी जो राजीनामा दिला तो इथल्या राजकीय संस्कृतीला साजेसा निर्णय होता. जुडीशियल इथिक्सचा भाग म्हणून सुद्धा ते अतिशय योग्य होते. न्यायालयाची टिप्पणी काहीही असेल तरी आपल्या आतला आवाज आपला विवेक जागृत ठेवून पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला होता तो कालही योग्यच होता आणि आज सन्माननीय न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतर सुद्धा आम्हा सगळ्यांना योग्यच वाटतो.