दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- संतोष भसमपुरे
==========================
लातूर/अहमदपूर:- सन २०२१/२२ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील मौजे चिखली येथील पाझर तलाव फुटल्याची घटना सर्वपरिचित होती.या फुटलेल्या पाझर तलावातील पाण्यामुळे नदीच्या दुतर्फा असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झालेले होते.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करून मोबदला देण्याचे निर्देश दिले असताना मौजे चिखली येथील काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही.
लाभ न मिळाल्यामुळे येथील शेतकरी गेल्या वर्षभरापासून अहमदपूर तालुक्यातील तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागत असून अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही.
याबाबत सविस्तर वस्तुस्थिती अशी की पाझर तलाव फुटल्याने नुकसान झालेले क्षेत्राचा पंचनामा हा नदीच्या एकाच बाजूचा करण्यात आला असून दुसऱ्या बाजूच्या शेतकऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप चिखली येथील शेतकऱ्यांनी केला आहे .त्याबरोबर बोगस पंचनामे करून इतर शेतकऱ्यांना लाभ दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे .यात मंडळ अधिकारी ,आणि चौकशीसाठी नेमलेल्या समितीतील अधिकारी सामील असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.पुराच्या पाण्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन खसून गेली असूनही त्यांचा पंचनामा करण्यात आला नाही.
पाझर तलावापासून १.५ किलोमीटर दूर असलेले क्षेत्र बाधित दाखविण्याचा प्रताप येथील मंडळ अधिकाऱ्यांनी केला आहे असा आरोपही करण्यात आला आहे .
२०२१ पासून पाठपुरावा करूनही त्यांच्या तक्रारीवर आजतागायत कुठलही निर्णय देण्यात आला नसून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे, न्याय मिळण्यात दिरंगाई होत असून शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे दिनांक ३०/०६/२०२३ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .सरपंचाच्या बोगस सह्या करून काहीचे पंचनामे बोगस करण्यात आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पासून दूर ठेवणाऱ्या प्रशासनातील अधिकारी वर्गावर कायदेशीर कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अहमदपूर तालुक्यातील प्रहार पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री संभाजी दादा केंद्रे यांनी केली आहे ,अन्यथा त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.