दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
टर्म प्लॅन किंवा टर्म इन्शुरन्स ही देशातील विविध प्रकारच्या विमा पॉलिसींपैकी एक लोकप्रिय पॉलिसी आहे. मध्यमवर्गीय आपले कुटुंब सुखी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.यानंतरही काहीवेळा अशी परिस्थिती उद्भवते की कुटुंबात संकट येते. संकटाच्या या काळात विमा पॉलिसी उपयोगी पडते. कोणतीही अनुचित घटना घडल्यास टर्म प्लॅन तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. विमा पॉलिसी घेताना आपल्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात, असा एक प्रश्न म्हणजे टर्म प्लॅन घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला किंवा खून झाला तर त्याच्या नॉमिनीला पैसे मिळतील का?
आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. प्रतीक्षा कालावधी नाही टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, विमा कंपनी पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला विम्याची रक्कम देते. टर्म इन्शुरन्स नैसर्गिक मृत्यू, आजारपणामुळे मृत्यू, अपघातामुळे मृत्यू कव्हर करतो. आत्महत्या झाल्यास टर्म प्लॅन अंतर्गत पैसे मिळण्यासाठी एक वर्षाचा प्रतीक्षा कालावधी लागू शकतो.
हत्येनंतर विमा क्लेम कसं करावं एखाद्या व्यक्तीने आज टर्म इन्शुरन्स घेतला असेल आणि उद्या त्याचा खून झाला असेल तर अशा परिस्थितीत त्याला विम्याचे पैसे मिळतील का? तर याचं उत्तर होय आहे. विमा कंपन्या नॉमिनीला पूर्ण पैसे देतील, फक्त एकच अट आहे की पॉलिसीधारकाच्या खुनात त्या नॉमिनीची भूमिका नसावी.
नॉमिनीवर हत्येचा आरोप असेल, तर अशा परिस्थितीत विमा कंपनी विम्याचे पैसे देण्यास नकार देऊ शकते. नॉमिनी जोपर्यंत कोर्टाने निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत नॉमिनीला पैसे मिळणार नाहीत. यासोबतच, ज्यावेळी विमा घेणारी व्यक्ती काही गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेली असते आणि त्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू होतो तेव्हा विमा कंपनी विम्याची रक्कम देण्यास नकार देऊ शकते.
क्लेम कसा फेटाळला जातो? टर्म प्लॅन घेताना, विमा कंपनी विमा घेणाऱ्या व्यक्तीकडून संपूर्ण हेल्थ रिपोर्ट घेते, परंतु ज्यावेळी विमा घेणारी व्यक्ती आपला आजार लपवते आणि मरण पावते, अशा परिस्थितीतही विमा कंपनी त्याला पैसे देण्यास नकार देऊ शकते. नॉमिनीला एक पैसाही मिळणार नाही. कमी प्रीमियम भरण्यासाठी अनेकदा लोक आपला आजार किंवा कोणतीही वाईट सवय लपवतात.