दै चालु वार्ता वृत्तसेवा
/
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.परमबीर सिंह यांना देशाबाहेर जाण्यासाठी केंद्रानं मदत केल्याची भूमिका नाना पटोलेंनी मांडल्यानंतर त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘नाना पटोले काहीही बोलत राहतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही‘, असं फडणवीस म्हणाले आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठवाड्यातील अतीवृष्टीचं संकट आणि राज्य सरकारची मदत याविषयी देखील भूमिका मांडली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना खोचक टोला लगावला आहे. ‘नाना पटोले काहीही बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही. नाना पटोले असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीत देखील बोलू शकतात‘, असं फडणवीस म्हणाले आहेत.