१ ऑक्टोबर रोजी लाखोचा मराठा समुदाय नांदेडमध्ये होणार दाखल…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मुख्य मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत होते,सरकारच्या मनधर्नी नंतर तब्बल सतराव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण सोडलं आणि सरकारला चाळीस दिवसाचा अवधी देत त्याच ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण करण्यात यावे असे आव्हान त्यांनी केले.
गाव पातळीवर या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत सर्वसामान्य मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी साखळी उपोषणास सुरुवात केली.
गावागावात साखळी उपोषण, लाक्षणिक उपोषण, ठिय्या, आंदोलने, लोकप्रतिनिधी च्या अंत्ययात्रा काढत समाजाने सरकारचा निषेध व्यक्त केला. आता या 40 दिवसात श्री मनोज जरांगे पाटील हे स्वस्थ न बसता राज्यभर दौरा काढुन समाज जागृती करीत आहेत.
नांदेड जिल्ह्याचा समावेश त्यांनी दुसऱ्याच दिवशी केला असुन ते 1 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी उमरखेड येथिल साखळी उपोषणास बसलेल्या बांधवाना भेट देऊन हदगांव येथिल तहसील समोर चालु असणाऱ्या साखळी उपोषणास भेट देण्यासाठी येतील आणि तेथून ते थेट मौजे कामारी तालुका हिमायतनगर येथील मराठा योद्धा सुदर्शन देवराये यांच्या कुटुंबास सांत्वन पर भेट देणार असून त्यानंतर अर्धापूर येथे उपोषण स्थळी दुपारी 4 वाजता त्यांची सभा होणार आहे. नांदेडमध्ये ते मार्केट कमिटी मैदान,नवा मोंढा, नांदेड येथे सायंकाळी साडेसहा वाजता पोहचतील व त्याच ठिकाणी त्यांची भव्य सभा होणार आहे.
सदरील सभेत सहभागी होण्यासाठी गावागावातून सोळा तालुक्यातील समाज बांधव , वृद्ध, बाल गोपाळ ,महिला भगिनी तरुण वर्ग , मोठ्या संख्येने सामील होणार असल्याचे सकल मराठा समाजातर्फे कळविण्यात आले आहे.