बस स्थानक की जाहिरात केंद्र-माणिक भोंग…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर):निमगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेला बस थांबा हा गायब झाला आहे की काय असे वाटू लागले आहे.या बस थांब्यांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्स लावून जाहिरात बाजी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या बस स्थानका समोरील जागेमध्ये रोड लगत फळ विक्रेत्यांनी आपले स्टॉल उभारल्याने प्रवाशांसाठी उभे राहण्यासाठी कुठेही जागा शिल्लक राहिलेली नसून या ठिकाणी बस थांबा आहे की नाही असे चित्र निर्माण झाले आहे. हा बस थांबा व समोरील जागा ही खाजगीकरण झाली की काय असे मत ग्रामपंचायत निमगाव केतकीचे माजी सदस्य माणिक भोंग यांनी व्यक्त केले आहे.तरी बस स्थानकावरील फ्लेक्स लावून करण्यात आलेली जाहिरात बाजी व फळ विक्रेत्यांनी उभारलेल्या स्टॉल वरती संबंधित विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुसज्ज बस थांबे उभारण्याची गरज..
निमगाव केतकी येथून वेगवेगळ्या गावी जाण्यासाठी एसटी बसथांबे आहेत. मात्र, या ठिकाणी शेड, बाकडे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि इतर सुविधांची वानवा आहे. त्यामुळे प्रवाशांना ऊन, वारा, पावसाचा त्रास सहन करीत बसची वाट बघत थांबावे लागत आहे. तरी या सर्व ठिकाणी सुसज्ज सोय असलेले बसथांबे उभारावेत, अशी मागणी निमगाव केतकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य माणिक भोंग व प्रवाशांकडून होत आहे. निमगाव केतकी या ठिकाणाहून इंदापूर, पुणे, सातारा, फलटण, बारामती या ठिकाणी जाणारी शाळकरी मुले, कामगार, व्यापारी, नोकरदार तसेच शेतकरीवर्गाची मोठी वर्दळ असते.
पुणे व बारामती, इंदापूर, लोणी,कौठळी जाणारे प्रवासी जागे अभावी केवळ नाममात्र नेमून दिलेली ठिकाणे रस्त्यावर उभे असतात. या सर्व बसथांब्यांवर सर्व एसटी बस थांबतात. परंतु प्रवाशांसाठी बसण्यासाठी या उभ राहण्यासाठी कोणतीही उपायोजना करण्यात आलेली नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरतीच उभा राहून एसटीची वाट पहावी लागते.शालेय विद्यार्थ्यांसाठी पण त्या ठिकाणी कोणतीही सोय नाही विद्यार्थ्यांना रोज सकाळी तासनतास बस भेटत नाही,यामुळे विद्यार्थ्यांना रोडवरतीच ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.
या ठिकाणी दररोज शेकडो प्रवाशांची गर्दी असते. मात्र, यापैकी एकाही थांब्याला ना शेड आहे, ना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था. पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह तर लांबचीच गोष्ट. या ठिकाणी कोणतीच व्यवस्था प्रवाशांसाठी नाही. केवळ बसची वाट बघत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. उन्हाळ्यात प्रवाशांना उन्हाचे चटके सोसावे लागतात. पावसाळ्यात पाऊस व वार्याचा सामना करावा लागतो.
अनेक प्रवासी बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांचा आधार घेतात. इंदापूर-बारामती मार्गावर जे बसथांबे आहेत. ते सोयीचे नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवासी एका ठिकाणी, बसथांबे दुसर्या ठिकाणी, अशी अवस्था आहे. जागेअभावी बहुतांश एसटी बस रस्त्यावर उभ्या करून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यादरम्यान वाहतूक कोंडी होते. प्रशासनाने प्रवाशांच्या सोईच्या ठिकाणी सर्व सुविधांयुक्त बसथांब्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे माणिक भोंग यांनी सांगितले.