कारला ग्रामपंचायत वासियांची तक्रार…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला गाव हे २०१९ मध्ये भूमी अभिलेख कार्यालयाला जोडले गेले व गावचा सर्वे २०१३ साली झाला होता;परंतु ग्रामपंचायतला विश्वासात न घेता कारला गावातील घरांच्या नोंदी भूमी अभिलेख कार्यालयाला जोडल्या गेल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की,२०१३ साली कारला ग्रामपंचायत मधील घरांचा सर्वे झाला होता.त्यानंतर २०१९ मध्ये तो सर्वे भूमी अभिलेख कार्यालयाला जोडला गेला.यामध्ये गावातील नागरिकांच्या पीआर कार्ड मधील नावांमध्ये व क्षेत्रफळामध्ये चुका झाल्याचे यावेळी गावकऱ्यांनी नायब तहसीलदार अविनाश पोटदुखे यांना निवेदन देतेवेळी सांगितले.
सामुहिकरित्या ग्रामपंचायत रेकॉर्ड प्रमाणे नोंदी करण्यात याव्या असा ठराव कारला ग्रामपंचायत ने १८ सप्टेंबर २०२३ रोजी घेतला.तसेच गावातील तक्रारी दुरुस्ती करिता ग्रामपंचायतकडे आल्या असून भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ यावर कारवाही करून समस्येचे निराकरण करावे आणि जर या समस्येचे निवारण पंधरा दिवसात न झाल्यास आम्ही गावकरी भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा अल्टीमेटम कारला ग्रामपंचायत द्वारे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन दुधाट व ग्रामपंचायत सरपंच प्रशांत वानखडे यांनी दिला.
निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन दुधाट,ग्रामपंचायत सरपंच प्रशांत वानखडे,राजेंद्र म.दाळू,प्रदीप दाळू,राजेंद्र पं.दाळू,सुधाकर तायडे,सुनील ठाकरे,विनायक थुते,ज्ञानेश्वर वानखडे,नंदकिशोर दाळू,सुभाष दाळू,श्रीकृष्ण दुधाट,मोहन नेटकर उपस्थित होते.