
दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
लातूर :-लातूर जिल्ह्यात औसा-लामजना मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार झाले, तर 13 जण जखमी झाले. वाघोली पाटीजवळ बोलेरो आणि काळीपिवळीची समोरासमोर धडक झाली. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही वाहनांच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर झाले आहेत. तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी (एमएच 24 एफ 0959) औसावरून लामजन्याकडे प्रवासी घेऊन जात होती. तर बोलेरो गाडी (एमएच 30 एए 4809) लामजन्यावरून औसाकडे जात होती. वाघोली पाटीजवळ दोन्ही गाड्या अचानक समोरासमोर आल्या आणि भयंकर अपघात घडला.
अपघात इतका भीषण होता की यात काळीपिवळी जीपचा चक्काचूर झाला, तर बोलेरो गाडी 150 फुट लांब जावून खड्ड्यात पडली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एकाचा लातूर येथे उपचारासाठी घेऊन येत असताना मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अपघातातील मृतांचे नातलग सोबत नसल्याने उशिरापर्यंत त्यांची ओळख पटू शकली नाही. या अपघातात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून, 10 जण किरकोळ जखमी आहेत. सर्वांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.घटनास्थळी औसा पोलिसांनी पाहणी करून वाहतूक सुरळीत केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनीही घटना स्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.
दरवाजे तोडून प्रवाशांना काढावं लागलं बाहेर… अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमींसह मृतांनाही जीपचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमधील मयत असून, कोण कोठून बसले, कोणत्या गावातील होते याची माहिती पोलिसांनाही कळू शकली नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मयत व जखमींची नावे कळली नसल्याचे औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी सांगितलं.