दैनिक चालु वार्ता भोर प्रतिनिधि -जीवन सोनवणे
राष्ट्रवादीत योग्य वागणूक मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला- सभापती लहूनाना शेलार
नसरापूर (जि. पुणे) : भोर पंचायत समितीचे सभापती लहू शेलार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत आज (ता. १३ जून) काँग्रेसचा हात हाती घेतला. काँग्रेसमध्ये त्यांचे स्वागत दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांनी केले. त्या कार्यक्रमात बोलताना आमदार थोपटे यांनी वरील गौप्यस्फोट केला. यापूर्वी राजगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव कोंडे आणि अशोक शेलार तसेच, जिल्हा परिषदचे माजी सभापती बाळकृष्ण दळवी यांनी राष्ट्रवादी सोडून थोपटेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भोर तालुक्यात मात्र निव्वळ आम्हाला विरोध म्हणून व्यक्तीद्वेषाचे राजकारण केले जात आहे.
येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता काँग्रेसमध्ये येत आहे. राष्ट्रवादीचा एकुण एक कार्यकर्ता काँग्रेसमध्ये आणल्याशिवाय आमचे कार्य पूर्ण होणार नाही, असा इशारा भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीला दिला.
मागील काही दिवसांत लहूनाना शेलार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
आमचे मात्र सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण आहे, त्यामुळेच मागील काही दिवसांत राष्ट्रवादीचे तीन नेते आणि आज लहूनाना शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लहुनाना शेलार यांच्या कुटुंबीयांनी माजी आमदार काशिनाथराव खुटवड यांच्यासाठी जीवाचे रान केले. पण, राष्ट्रवादीत योग्य वागणूक मिळत नसल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लहू शेलार म्हणाले की, मागील पाच वर्षांत पंचायत समितीमध्ये सदस्य, उपसभापती व सभापती म्हणून काम करत असताना जो त्रास पक्षामधूनच देण्यात आला, तो विरोधकांनीही कधी दिला नाही. पक्षात कायम अपमानास्पद वागणूक देत घुसमट करण्यात आली. त्याला कंटाळूनच आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेषतः भोर हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या पडझडीकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. सभापती लहू शेलार यांनी पक्ष सोडताना तालुक्यातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला कायम साथ मिळाली. पण स्थानिकांनी प्रचंड त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठांना यात तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीला लावलेला सुरुंग पक्षासाठी अडचणीचा ठरू शकतो.