दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- नवरात्रोत्सव आला की,राज्यातील देवीच्या साडेतीन पीठांकडे भाविकांचे पावले वळायला लागतात.राज्यातील कोल्हापूर,तुळजापूर,माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन पीठं आहेत.या शक्तीपीठांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्याची आराध्य दैवत असलेल्या मुऱ्हा देवी संस्थानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबविले जातात.दरवर्षी लहान मुलांसाठी बालसंस्कार शिबिरासह गेल्या कोरोना प्रादुर्भाव काळात गरजूंना अत्यावश्यक वस्तूच्या वाटप तसेच मुऱ्हा देवीच्या संस्थेकडून शासनाला कोरोना मदत निधी सुद्धा देण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव गोवर्धन बोन्द्रे यांनी दिली.
सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांना रेणुका देवीच्या दर्शनाला माहूरला जाणे शक्य नसल्यामुळे स्वतः रेणुका माता सातपुड्याच्या पायथ्याशी प्रगटली अशी आख्यायिका सांगितली जाते.हीच माहूरची रेणुका माता म्हणून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हादेवी आहे.या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षहीभर येथे महिलांनाच पूजेचा मान दिला जातो.
मुऱ्हादेवी संस्थांचे वैशिष्ट्य असे आहे की,देशात हरीभजनांसाठी मंदिरे खुली करावी यासाठी महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान देशांतील सर्वात पहिले हरिभजनाची खुले झालेले मंदिर ते म्हणजे मुऱ्हादेवी.महात्मा गांधींच्या पत्राला प्रतिसाद देत त्याकाळी असणाऱ्या मंदिर संस्थांच्या विश्वस्तांनी हरिभजनासाठी हे मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतला होता.त्यासाठी गांधीजींनी आभार पत्राद्वारे व्यक्त केले होते.त्या पत्राची भव्य प्रत मंदिराच्या परिसरात पाहायला मिळते.