दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – इंदुरीकर महाराज नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. अशातच त्यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणातील घडामोडीवर आपल्या कीर्तनातून लोकांना सल्ला दिला आहे.
इंदोरीकर महाराज म्हणाले की,’नेत्यांच्या नादी लागायचं आणि त्याच्या मुलाला गटप्रमुख करायचं, मग त्याच्या सुनेला तालुका प्रमुख करायचं. स्वत:ची आई मात्र शेतात घाम गाळतेय. शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त वापरलं जातेय. २०-२२ वर्षांची ही तरुण मुलं दिवसभर लोकांचा प्रचार करतायेत. स्वत:च्या करिअरवर लक्ष द्या. या नेत्यांच्या नादाला लागून आयुष्याची माती करु नका.’ असं म्हणत राज्यातल्या तरुण पिढीला इंदोरीकर महाराजांनी सल्ला दिला आहे.
दरम्यान त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, राज्यातील सत्तापालट झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात रोज शाब्दिक युद्ध होताना दिसून येत आहे. तसेच राज्यात आता सर्व राजकीय पक्षाकडून लोकांशी संवाद साधल्या जात आहे. या सर्व परिस्थितीवरून इंदोरीकर महाराजांनी हे विधान केले आहे.
तत्पूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर दिसलेल्या इंदोरीकर महाराजांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर ते म्हणाले होते की,”आपण समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे, राजकारणात कधीच उतरणार नाही” भाजप प्रवेश आणि उमेदवारी ही चर्चा निष्फळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.