दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या काही वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मुंबईतील अंधेरी येथील एका चौकाच्या नामकरण सोहळ्यासाठी आले असता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहेृ.
या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी गुजराती, राजस्थानी समाजाचं कौतुक केलं आहे. दिवंगत शांतीदीदी चंपालालजी कोठारी यांचे नाव या चौकाला देण्यात आलं आहे. यावेळी मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात गुजराती, राजस्थानी लोकांचा योगदान असल्याचं कोश्यारी म्हणाले. राजस्थानी मारवाडी समाज केवळ धनसंचय न करता शाळा, महाविद्यालये काढून गोरगरीबांची सेवा देखील करत असतो.
प्रामुख्याने यात मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात गुजराती आणि राजस्थानी समाजाचं योगदान आहे. जर गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असंही ते म्हणाले. भारत देश हा शूरवीर आणि बलिदान देणाऱ्यांचा देश आहे. लोकांच्या दातृत्वामुळेच हा देश मोठा झाला आहे, असेही ते म्हणाले होते. या कार्यक्रमाला अमरावतीचे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा सारखे लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.