दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
आपल्या हिंदू धर्मात जे सणवार साजरे होतात त्यांची कार्य योजना खूप विचारपूर्वक केलेली आढळते .श्रावणातील प्रत्येक क्षण सृष्टीतील काहीतरी बदलाची सुरुवात दाखवतो . श्रावण मास सृष्टीमध्ये अमूलाग्र बदलाचा शिखर बिंदू आहे . पावसाची सुरुवात होऊन दीड महिना झालेला असतो , सर्वत्र हिरवळ पसरलेली असते , शेतामध्ये पेरणी होऊन पिके डोलत असतात व शेतकरी आनंदी झालेला असतो , मोकळा झालेला असतो व त्याच काळात श्रावण मास येतो . श्रावण मासातील सर्व सण आपल्या पूर्वजांच्या निसर्ग पूजेचा एक अविष्कार असतो . श्रावण महिन्याला हिंदी मध्ये सावन तर संस्कृत मध्ये नभस असे म्हणतात . श्रावणामध्ये पहिलाच सण येतो नागपंचमी . सर्वत्र पाऊस झालेला असतो नागांच्या वस्ती स्थानामध्ये पाणी गेलेले असते व ते बाहेर पडतात . त्या नाग राजांची निवासस्थाने शोधून त्यांचे पूजन करावे याकरता नागपंचमी साजरी करण्याचे विधान आहे . नागपंचमीच्या दिवशी आपल्या घराण्याचे आपल्या मुलाबाळांचे नागराज यांनी रक्षण करावे याकरता नागदेवतेची प्रार्थना करायचे असते . त्यादिवशी चुलीवर तवा ठेवत नाहीत , सर्वजण झोके बांधून त्यावर झोका घेतात . श्रावणामध्ये मंगळवार हा तर नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी आनंदाचा दिवस असतो या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली एकत्र येऊन मंगळागौरीचे पूजन करून आलेल्या सवाष्णींना हळदीकुंकू देतात , रात्री जागरण करून पाच वर्ष मंगळागौर केली जाते . श्रावणामध्ये रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आदर्श उदाहरण असते . रक्षाबंधनाला बहिण कितीही दूर असली तरी भावाच्या प्रेमाने रक्षाबंधनाला माहेर येते . नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्रामध्ये नारळ अर्पण करून मच्छीमारीसाठी बाहेर पडतात कारण त्यानंतर मोसमी वारे कमी झालेले असतात . त्यानंतर येतो जन्माष्टमीचा सण . श्रीकृष्णाचा जन्मोत्सव ! भारतभर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो . तसे पाहिले तर श्रावणातील प्रत्येक वाराला महत्त्व आहे . श्रावणी सोमवार म्हणजे शिवाचे पूजन करून उपवास करून रात्री नैवेद्य दाखवतात , मंगळवारी मंगळागौर असते , बुधवारी बुध पूजन तर गुरुवारी बृहस्पति पूजन करतात . शुक्रवारी जिवती पूजन करून पुरणाच्या दिव्यांनी अपत्यास ओवाळले जाते .महिलावर्ग या दिवशी घरी हळदीकुंकू करतात . श्रावणी शनिवारी शनि मारुती व अश्वस्थ पूजन केले जाते . रविवारी आदित्यराणूबाई पूजन केले जाते , श्रावणामध्ये सूर्याचा नवजन्म झाल्यासारखा दिसतो .
श्रावण हा वर्षातील सर्वोत्तम महिना असतो श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ! अशा या निसर्गरम्य महिन्यांमध्ये आपल्या पूर्वजांनी सर्व देव-देवतांची पूजा करण्याचा करण्याची परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे . आपण सर्वांनी या सणावार साजरा करण्याचा उद्देश व त्यामागील विज्ञान लक्षात घेऊन आनंद घ्यावा !