दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटलाय. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे विरुद्ध ठाकरे असाही ‘सामना’ रंगलाय. उद्धव आणि राज ठाकरेंनंतर आता दोघांचे चिरंजीवही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
अमित ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नेमकं काय घडलंय, बघुयात.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकमेकांवर टीका करणं महाराष्ट्राला नवं नाही. संधी मिळेल तेव्हा हे दोघंही टोले लगावण्याची संधी सोडत नाहीत. आता ठाकरेंच्या पुढल्या पिढीनंही हे वैर कायम ठेवण्याचं ठरवलेलं दिसतंय. राज ठाकरेंचे चिरंजीव आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर आदित्य ठाकरेंदेखील सध्या ‘शिवसंवाद’ यात्रा करतायत. यावरूनच अमित ठाकरेंनी टोलेबाजी केलीयं.
राज ठाकरे यांच्या राजकारणाची जडणघडण शिवसेनेतूनच झालीये. मात्र पक्षातून बाहेर पडल्यानंतर आणि नवा पक्ष काढल्यावर त्यांचा शिवसेनेसोबत उभा दावा आहे. ठाकरेंच्या पुढल्या पिढीमध्येही ही कटुता कायम असल्याचं अमित ठाकरेंच्या ताज्या विधानावरून स्पष्ट होतंय.