दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : मी राहीन किंवा न राहीन; पण 2014 ला जे जिंकून आलेत ते आता 2024ला जिंकणार का, याची चिंता त्यांनी करावी. 2024ला ते पंतप्रधान राहतील काय, अशा स्पष्ट शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हानच दिले आहे.
2024 साठी सर्व विरोधी पक्षांनी एकीचे बळ दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपला धोबीपछाड देत नितीश कुमार ‘एनडीए’तून बाहेर पडले आणि बिहारमध्ये जदयू, राजद, काँग्रेससह सात पक्षांच्या महागठबंधनचे सरकार आले आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाची आणि राजद नेते तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करणाऱया भाजपला सत्तेबाहेर फेकल्यामुळे देशभरात समाधान व्यक्त होत असून, बिहारमध्ये आझादी का अमृतमहोत्सव सुरू झाल्याची सर्वत्र भावना आहे.
शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ओपन चॅलेंज दिले. 2024च्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, मी कोणत्याही पदासाठी दावेदार नाही. मी राहीन किंवा न राहीन याची चिंता सोडा, पण ज्या व्यक्तीने 2014ची निवडणूक जिंकली ती व्यक्ती 2024 जिंकणार आहे का? ते पंतप्रधान राहणार काय, याची चिंता त्यांनी केली पाहिजे.