दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे : पुण्यात वास्तव्याला असणा-या रीना वर्मा या नव्वद वर्षांच्या आजीबाई अथक प्रयत्नानंतर अखेर गेल्या वर्षी १६ जुलैला रावळपिंडीमध्ये पोहचल्या. आयुष्यभराची पुंजी गुंतवून बांधलेल्या घराला भेट दिल्यानंतर त्यांना जणू तीर्थयात्राच घडल्यासारखं वाटलं. या घरी जाणं हे त्यांचं आयुष्यभराचं स्वप्न होतं.
त्यांचं झालेलं स्वागतही भावूक करणारं होतं. त्यांच्यावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. लोकांनी या ९० वर्षांच्या पाहुणीसोबत ढोल वाजवून नाच केला. या सगळ्या प्रेमानं रीना एकदम भारावून गेल्या.
१९४७ साली झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या काही आठवडे आधीच रीना यांच्या कुटुंबियांनी रावळपिंडीतलं आपलं ‘प्रेम निवास’ हे घर सोडलं आणि ते भारतात आले.
२०२१ साली एका पाकिस्तानी माध्यामाला दिलेल्या मुलाखतीनंतर भारत-पाकिस्तानमधील ऑनलाइन कम्युनिटीत रीना वर्मा एकदम प्रसिद्ध झाल्या. ‘इंडिया-पाकिस्तान हेरिटेज क्लब’ नावाच्या फेसबुक ग्रुपमधील सदस्यांनी रीना यांच्या रावळपिंडीमधील पिढीजात घराचा शोध घ्यायला सुरूवात केली.
एका महिला पत्रकाराला अखेरीस ते घर सापडलं. पण त्यानंतरही इच्छा असूनही रीना पाकिस्तानला जाऊ शकल्या नाहीत. कारण कोव्हिडचे निर्बंध होते.
यावर्षी मार्च महिन्यात त्यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसाला अर्ज केला. पण कोणतंही कारण न देता तो नाकारला गेला.
“मला प्रचंड धक्का बसला. जगाचा निरोप घेण्यापूर्वी फक्त एकदा आपलं पिढीजात घर पाहण्याची इच्छा असलेल्या ९० वर्षांच्या म्हाताऱ्या बाईचा अर्ज नाकारला जाईल असं मला वाटलंही नव्हतं. पण तसं झालं,” रीना सांगतात.
त्या सांगतात की त्यांना मधेच अडकल्यासारखं वाटत होतं. पाकिस्तानमध्ये काही महिन्यांपूर्वी राजकीय उलथापालथ सुरू होती आणि आता अर्ज करण्याबाबत काय करायचं हेच रीना यांना समजत नव्हतं. पण तरीही त्या पुन्हा अर्ज करण्याच्या विचारात होत्या. मात्र त्याआधीच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांनी त्यांच्याबद्दलची बातमी वाचली. त्यांनी पाकिस्तानच्या भारतातील दूतावासाला रीना यांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. आणि ह्या आजी गेल्या वर्षी १६ जुलैला रावळपिंडीला तेथील त्यांच्या कुटुंबियांमध्ये सामील झाल्या. रीना आजी म्हणतात की, ‘पुणे शहर आणि येथील माझे घर मला तेवढेच आवडते जेवढे रावळपिंडीमधील घर.’