दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : अमरावती महापालिकेकडून मालमत्ता करवाढीच्या संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाला उपमुख्यमंत्री आणि स्थानिक पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.
अमरावती महापालिकेतील प्रशासकाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, स्थानिकांसह राजकीय मंडळींनी या निर्णयाला केलेल्या विरोधामुळे फडणवीसांनी हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस राष्ट्रवादीने दिलेल्या प्रतिक्रियेवर खा.डॉ.अनिल बोंडे यांनी टीका केली आहे. ‘निर्णय फडणवीसांचा पण जल्लोष मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचा’ असे म्हणत बोंडेंनी आघाडीवर निशाणा साधला आहे.
हा इतरांना पोर झाल्यावर आनंद साजरा करण्याचा प्रकार
खा. डॉ. बोंडे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारने कुठलेही निर्णय घेतले नाही, त्यामुळे त्यांना जल्लोष करण्याची संधीच मिळाली नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस हे तात्काळ निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आताच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना फडणवीस जलदगतीने निर्णय घेत आहेत. त्यामुळे या निर्णयाप्रमाणेच आणखी अनेक निर्णय ते घेणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जल्लोष करण्याची संधी ते देणार आहेत.
त्यासोबतच फडणवीस यांनी मालमत्ता करवाढीच्या संदर्भात आवश्यक त्या सूचना आणि उपाययोजना सुचवत प्रशासनाला निर्देशही दिले आहेत. फडणवीसांच्या या निर्णयामुळे काँग्रेस राष्ट्रवादी जल्लोष करत आहे. त्यामुळे आपल्याला पोर झाले नाही तरी इतरांना पोर झाल्यावर आनंद साजरा करण्याचा या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.’ अशी खोचक टिप्पणी खा. बोंडेंनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.