दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सावंतवाडी : शिवसेनेची होणारी पडझड पाहून शल्य वाटून काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांची ही राजकीय आत्महत्या आहे.
त्याच्या डोळय़ांदेखत ४० आमदार गेले. हा नियतीचा खेळ आहे, त्यामुळे शिवसेनेच्या पडझडीचे मला शल्य वाटण्याचा प्रश्नच नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाची युती त्या वेळच्या सोईनुसार – परिस्थितीनुसार ठरेल. सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयामध्ये नारायण राणे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजू परब, संदीप कुडतरकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, तालुकाध्यक्ष महेश धुरी आदी उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांनी राणे यांना शिवसेनेची पडझडीबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले, मी शिवसेनेतून त्या वेळी एकटा जरी बाहेर पडलो असतो तरी परिणाम झाला असता. आमचे त्या वेळचे बंड आणि आता चाळीस आमदारांनी केलेले बंड याच्यामध्ये मोठा फरक आहे आणि विषयही वेगवेगळे आहेत. त्यामुळे शिवसेनेची पडझड होत असल्याचे शल्य वाटून काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातकापणीच्या हंगामामध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून मी लक्ष देणार आहे.
भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती सोयीच्या ठिकाणी होईल. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद सहकार क्षेत्रातील निवडणुकीमध्ये स्थानिक विचाराने ठरवले जाईल. त्या वेळी पदाधिकाऱ्यांच्या विचारांचा निश्चितच विचार केला जाईल, असे ते म्हणाले.मनसेचे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने उमेदवारी मागे घ्यावी आणि रमेश लटके यांच्या पत्नीला पािठबा द्यावा असे पत्र दिले आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. भाजपचा उमेदवार विजयी ठरविण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ, असे ते म्हणाले.शिवसेनेच्या सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव तुमच्यावर टीका करत आहेत, असा प्रश्न नारायण राणे यांना केला असता ते म्हणाले, नारायण राणे यांच्यासमोर उभे राहून बोलण्याची त्यांची पात्रता, हिंमत नाही. कोकण विकासाचे स्वप्न, कोकणातील लोकांचे संसार आणि कार्यकर्ते उभे करण्याचे काम राणे यांनी केले आहे. हे फक्त टक्केवारीचे राजकारण करत आहेत.
सर्वागीण विकास करण्यासाठी मी केलेला प्रयत्न जनतेला माहिती आहे. यांनी साधी बालवाडी केली नाही. त्यांच्या काळामध्ये १७० कोटी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी तरतूद केली, मात्र दोन कोटीच खर्च केले. मी पालकमंत्री असताना दोनशे पंधरा कोटी रुपयांची तरतूद केलेली होती, असे राणे यांनी सांगितले. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी कुडाळमध्ये विनायक राऊत आणि संजय राऊत यांनी शिवसेना संपवली असे म्हटले होते यावर विचारले असता राणे म्हणाले, हे दोन राऊत आहेत. एक राऊत अंदर, दुसरा राऊत बाहेर आहे. आतला राऊत बाहेरचा राऊत कधी आत येणार, असे विचारतोय. त्यांनी शिवसेनेची वाट लावली.