दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्हातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२३/२४ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना लागू केली आहे.नांदेड जिल्हामध्ये माहे जुलै मध्ये अतिवृष्टीमुळे व माहे ऑगस्ट मध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे, अशा वेळी जिल्हातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनास तात्काळ अधिसूचना काढणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हामध्ये समितीमार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले असून जिल्हातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे.
तरी पिक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीमध्ये प्रतिकूल परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना ५० टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (Mid Season Adversity) अधिसूचना लागू केली असून सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम अदा करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी विमा कंपनीस दिले आहेत.