दैनिक चालु वार्ता, इंदापूर तालुका प्रतिनिधी-बापु बोराटे
शेटफळ हवेली येथे गेले कित्येक महिने शेतकऱ्यांच्या विहीर व बोअर मधील विद्युत मोटर व केबल तसेच इतर शेती उपयोगी साहित्य चोरून नेहण्याचे प्रमाण खुप वाढल्याने शेतकरी भयभीत झाला आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने आधिच लोडशेडींगचं संकट डोक्यावर असतानाच आता अशा चोरींच्या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे .यामुळे शेतकरी अजुनच आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांकडून या आधी चोरीच्या घटनेची तक्रार संबंधित क्षेत्रातील पोलिस ठाण्यात केली आहे.पंरतु पोलिस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही अशी शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यापुढे तरी पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त घालावी व चोरांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती शेतकरी वर्गातून केले जात आहे.
शेटफळ हवेली येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे, दिलीप नवले या दोन शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींची चोरी गुरूवारी रात्री केली आणि विहीरीवरील इतर शेती उपयोगी साहित्यांची मोडतोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी अमोल नवले यांचीही मोटर चोरट्यांनी चोरी केली आहे.यामुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरी मध्ये शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे , अशी माहिती चंद्रकांत शिंदे यांचे चिरंजीव मयुर शिंदे यांनी दिली.