दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करत आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवल्यानंतर, हार्दिक पंड्याने त्याचे पुढील लक्ष्याबाबत सर्वांना सांगितले.
हार्दिकला भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. आयपीएल २०२२च्या अंतिम फेरीत हार्दिकने चांगली कामगिरी केली. त्याने गोलंदाजीत १७ धावांत तीन बळी घेतले आणि त्यानंतर फलंदाजीत ३४ धावा केल्या.
हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक झाले. पंड्याने त्याचे वैयक्तिक पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले. रोहित शर्मा (६) नंतर तो सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारा खेळाडू ठरला. सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला, ”काहीही झाले तरी भारतासाठी विश्वचषक नक्कीच जिंकायचा आहे. मी माझे सर्वस्व देईन. मी नेहमीच संघाला पुढे नेणारी व्यक्ती आहे. माझ्यासाठी ध्येय सोपे आहे.”
२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात हार्दिकने एकटी झुंज दिली होती. हार्दिक २०१९च्या विश्वचषक संघाचा सदस्य होता, ज्यांना उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. ”भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे आणि चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे”, असे हार्दिकने सांगितले.