दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे. तर आशिष शेलार यांना भाजपचे मुंबई शहराध्यक्ष करण्यात आले आहे.
भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानंतर भाजपने ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.
काल संध्याकाळी या दोन्ही नेत्यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चंद्रकांत बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. तर आशिष शेलार हे मराठा समाजातून येतात. बावनकुळे यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.
यापूर्वी चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री करण्यात आले. चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा राज्यमंत्री झाले आहेत. आतापर्यंत मंगलप्रभात लोढा भाजपचे मुंबई अध्यक्ष होते. मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना मंत्री करण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांना मंत्री करण्यात आल्यानंतर नव्या अध्यक्षांच्या नावांची चर्चा सुरू झाली होती आणि आता त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. चंद्रकांत पाटील आणि मंगल प्रभात लोढा यांची 2020 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. दोघांचीही पूर्ण मुदतीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
आशिष शेलार हे या आधीही मुंबईचे अध्यक्ष होते. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे. एकाच व्यक्तीकडे मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेतृत्व अनुकूल नव्हतं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदावर वर्णी लागताच भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती.