दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली शानदार फॉर्म दिसत आहे. विराट प्रत्येक सामन्यात आपल्या जुन्या शैलीत खेळताना दिसत आहे.
तीन सामन्यांत अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध 16 धावा केल्यानंतर तो T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. या दमदार खेळीसह विराटने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडीत काढला आहे.
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चौथ्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीसह केएल राहुल, सूर्यकुमार, पंड्या, दिनेश आणि अश्विन यांनी भारताचा डाव मजबूत धावसंख्येपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. 44 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यासह कोहलीने ICC स्पर्धेत सर्वाधिक सामनावीर होण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली.
तसेच, सचिनने 10 वेळा ICC स्पर्धांमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचवेळी विराट कोहलीने आज आयसीसी स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यात आपला 10 वा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.
दुसरीकडे, कोहलीने सचिनचा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला आहे. सचिनला मागे टाकत कोहली ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. भारताचा माजी कर्णधार तेंडुलकरने 84 डावांमध्ये भारतासाठी 3,300 धावा केल्या होत्या.
शिवाय, ऑस्ट्रेलियात त्याची सरासरी 42.85 आहे. अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताच्या T20 विश्वचषकाच्या सुपर 12 सामन्यादरम्यान कोहलीने या बाबतीत तेंडुलकरला मागे टाकले. 33 वर्षीय विराटने 68 डावांमध्ये 3,301 धावा केल्या आहेत. कोहलीची ऑस्ट्रेलियात 55.94 ची अविश्वसनीय सरासरी आहे.