दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर भाजपा आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून नियोजनबद्ध पावले टाकण्यात येत आहे. प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर असणे, त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
यावेळी दोन्ही नेत्यांनी आगामी काळात युती करण्याचे स्पष्टपणे संकेत दिले.
शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. पण, काँग्रेसबरोबर अनेकवेळा युतीबाबत चर्चा केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अशात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले, “मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर येण्याची आमची तयारी आहे. मात्र, दोन्हीबाजूने तयारी असावी लागते. राज्यात आंबडेकर गट, गवई गट, कवाडे गट, आठवले गट आहेत. यातील अनेकांबरोबर आघाडी करून निवडणुका लढल्या आहेत. रामदास आठवले यांची केंद्रात मंत्री होण्यापूर्वी आमच्याबरोबर आघाडी असायची. आर आर पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यामुळे आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत,” असे अजित पवारांनी स्पष्ट केलं.