दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:शहरात वाढत्या वाहन : संख्येमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले असतानाच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बेकायदा करण्यात येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या वाहनांची पार्किंग व त्यामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीने देगलूरकर पुरते हैराण झाले आहेत.
शहरातील नवीन बस स्थानक, जुने बस स्थानक, भवानी चौक, पिरोजदीन टॉकीज अशा चारही दिशांना अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने प्रवासी मिळविण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होणे ही नित्याचीच बाब बनली आहे.
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या अवैध प्रवासीवाहतूकदारांसोबत
वाहतूक
पोलिसांकडून सूचक मौन बाळगण्यात येत आहे. त्यामुळे शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहतूककोंडी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होऊ लागली आहे.वाहतुकीवरून हाणामारी
यापूर्वी शहरातील नागोबा मंदिर परिसरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका शिक्षकास बेदम मारहाण झाली होती. त्यामुळे संतप्त झालेला पाचशेचा जमाव पोलिस स्टेशन देगलूर येथेजमला होता. यामध्ये प्रतिष्ठित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला होता. या प्रकारानंतर देगलूर पोलिस काहीतरी बोध घेतील असे वाटत असतानाच वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दुर्लक्षाने स्थिती बिकटच होत आहे.