दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी तब्बल 39 दिवस वाट बघावी लागली आणि आता दोन दिवस झाले तरी खाते वाटप होत नाही. त्यामुळे खाते वाटप कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. मलाईदार खात्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली परंतु सर्वच मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून बैठकीला उपस्थित होते. ही बैठक झाल्यानंतर सर्व अधिकारी बाहेर पडले आणि फक्त मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नव्या मंत्र्यांना सूचना दिल्या. काम करताना चुका होऊ देऊ नका, एकमेकांना सांभाळून घ्या, आमदारांना भेटा, त्यांना मानसन्मान द्या, त्यांची काम करा, लोकांची काम प्राधान्याने करा आणि विशेष म्हणजे मागच्या सरकारमध्ये आमदरांना सन्मान मिळत नव्हता, मंत्री भेटत नव्हते, या सरकारमध्ये तसं होऊ देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या.