दैनिक चालू वार्ता, शहादा
प्रतिनिधी : क्रिष्णा गोणे
शहादा:
तमिळनाडूतून जयपूर (राजस्थान) येथे विलायची घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून चोरट्यांनी तब्बल १८ लाखांचे वेलदोडे (वेलची) लंपास केली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांनंतर नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.बाबू थाहेर हुसेन (वय ५९, रा.करेमकामेंट, किटची पल्लायाम, सालेम, तमिळनाडू) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार २० जून २०२१ ला रवींद्रम एम. यांच्या मालकीच्या रवींद्रम रोडलाइन्स ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या ट्रक (टीएन ५२, आर २८१४)वरील चालक जोशी जोसे व सजनलाल कोलम हे सालेम येथून वेलदोड्याच्या ७५ बॅगा भरून जयपूरकडे निघाले होते. २२ जूनला पहाटे ते मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा येथील रेल्वेपुलाखाली थांबले होते.
तेव्हा ट्रकचालक झोपलेले पाहून चोरट्याने ट्रकचे सील तोडून वेलदोड्याच्या प्रत्येकी ५० किलोच्या ३२ बॅगा चोरून नेल्या. चोरी झालेल्या या वेलदोडा मालाची किंमत १८ लाख रुपये आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.