दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- कोरोनामुळे बऱ्याच काळापासून बंद असलेल्या रणजी मोसमाला अखेर आजपासून सुरुवात झाली आहे. रणजी करंडक देशांतर्गत क्रिकेटमधील एक महत्त्वाची स्पर्धा आहे.
रणजीमधून देशाला अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू मिळाले आहेत. यंदा रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. खरंतर रणजी करंडक स्पर्धा मागच्या महिन्यात सुरु होणार होती.
पण ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या भितीमुळे रणजी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. यंदा रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 15 मार्च असा असणार आहे. दुसरा टप्पा IPL 2022 स्पर्धेनंतर सुरु होईल. आजपासून सुरु झालेल्या रणजी मोसमात मुंबईचा पहिला सामना सौराष्ट्राविरुद्ध होत आहे. पृथ्वी शॉ कडे मुंबईचे नेतृत्व आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि सौराष्ट्रामधल्या या रणजी लढतीकडे देशभरातल्या मीडियाचे लक्ष आहे.
कारण या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे खेळत आहेत. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या या दोघांचा आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात समावेश होण्याची शक्यता कमी आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोघांना हरवलेला सूर शोधण्यासाठी रणजी कंरडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता.