दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली कार्यरत शिवसेनेच्या परभणी व जालना लोकसभा संपर्क प्रमुख पदी राज्याचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच ही नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खांद्यावर टाकलेल्या जबाबदारीचे स्वागत करुन अर्जून खोतकर यांनी परभणी व जालना या दोन्ही लोकसभा मतदारसंघात राज्य व केंद्र सरकारांतर्फे नागरी विकासाची हाती घेतलेली, मंजूर व प्रगती पथावरील सर्व लोकहिताची कामे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याशिवाय हे सर्व करीत असताना निरनिराळ्या क्षेत्रांत कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करुन पक्ष बांधणी तथा संघटनात्मक बाबींकडेही शीघ्र गतीने लक्ष द्यावे लागणार आहे.
परभणी जिल्हा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव आणि परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहूल पाटील यांची आपापल्या क्षेत्रांवर मोठी पक्कड आहे. उभय नेत्यांनी नागरी विकास कामांचा ही डोलारा मोठ्या प्रमाणात उभारला आहे. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी स्तरांवर पक्ष व संघटनात्मक बांधणी या दोन्ही नेत्यांची चांगली असल्यामुळे नव्याने जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या अर्जून खोतकर यांना ते मोठे आव्हानच ठरले जाईल यात शंकाच नसावी.
खोतकर हे या पदावर नव्याने येत असले तरी यापूर्वी असलेले राज्यमंत्री पद व तत्कालीन शिवसेनेचे उपनेते पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळल्या चे सर्वश्रुत आहे. संघटना बांधणीचा वकब आणि गनिमी पध्दतीने कार्य करण्याचा त्यांचा मोठा हाथखंडा आहे. जालना लोकसभा मतदारसंघ हे त्यांचे नियमित राजनैतिक क्षेत्र असून लगतच्या परभणी लोकसभा मतदार संघालाही ते तसे काही नवखे नाहीत. कमी आहे ती फक्त आणि फक्त कर्तबगार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची. शिवसेनेच्या मुशीतून चळवळ निर्माण केलेले व सामाजिक कार्याचा मुरब्बी वसा घेतलेले श्री.खोतकर हे ती उणीव सुध्दा लवकरच भरुन काढू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पक्षांतर्गतचे आजी-माजी कार्यकर्ते, पदाधिकारी व अन्य पक्षांतील धुरंधर राजकीय कार्यकर्ते, नेत्यांनाही गळ घालण्यात चतुरस्त्र असलेले खोतकर हे अर्जूनरुपी खेळी येणाऱ्या काळात नक्कीच अंमलात आणतील यात काही दुमत नसल्याचे बोलले जात आहे.
तोंडावर असलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून त्या पध्दतीने पक्षांतर्गत कार्यकर्ते, पदाधिकारी यांची फळी त्यांना लवकरच कार्यरत करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने निरनिराळे सेल, विभाग, संघटनात्मक व अन्य. कमिट्या कार्यरत करुन मुख्य प्रवाहाला जोडत अधिकाधिक बळकटी कशी देता येईल यावर त्यांना कटाक्ष ठेवावा लागणार आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतराला आता ७-८ महिन्यांचा कालावधी उलटत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, पक्ष चिन्ह आणि अन्य कायदेविषयक बाबी बऱ्यापैकी मार्गी लागल्या असल्या तरी सर्वोच्च न्यायालयात आणखी काही महत्वपूर्ण बाबी अद्याप ऐरणीवर आहेत. निर्णायक स्तरावरील त्या व अन्य काही अडचणी त्यांचाही सोक्षमोक्ष आगामी आठ-पंधरा दिवसांत लागला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कायद्याच्या चौकटीत व न्यायप्रविष्ट अशा वादातीत मुद्यांचा निर्णय लागल्यानंतर मात्र सर्वप्रथम प्रलंबित असलेला राज्य व केंद्रातील सुध्दा मंत्रीमंडळ विस्तारीकरण मार्गी लागू शकेल. त्यानंतर प्रलंबित विविध समित्या, मंडळं, महामंडळे आणि राजकीय व खासगी समित्या स्थापित करुन अधिकाधिक स्वपक्षीय व सहकारी मित्र पक्षांचे आमदार, खासदार, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची वर्णी लागली जाईल. ज्यामुळे कोणीही नाराजीचा सूर न काढता आपापल्या कामांत व्यस्त राहिले जातील. तद्वतच तोंडावर असलेल्या सर्वच स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत विजयी होऊ शकतील अशा सक्षम कार्यकर्त्यांना रिंगणात उतरवून त्या त्या संस्थांमध्ये सत्ता मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला मोठी मजल मारावी लागणार आहे. नव्हे भाजपा व मित्र पक्षांच्या सहकाऱ्याने सत्ता मिळवावी लागणार आहे. बघता बघता पावने दोन वर्षांचा कालावधी कधी निघून जाईल, हे कळणार सुद्धा नाही.
दरम्यान शिवसेना उपनेते, आमदार, मंत्री व संपर्क प्रमुख पदाचा अनुभव असलेले व त्या त्या क्षेत्रात माहिर असलेले अर्जून खोतकर यांना परभणी सह जालण्यातही संघटना नव्याने उभी करतांना त्यांची कसोटी लागणार आहे. हे करता करता व विरोधकांशी सामना करताना त्यांची पूरती दमछाक होणार आहे एवढं नक्की. राज्यात महाविकास आघाडी कायम राहिली जाणार असल्याने परभणी जिल्ह्यात अगोदरच संघटनात्मक आणि संवैधानिक प्राबल्य असलेल्या शिवसेनेची ताकद कॉंग्रेस, राष्ट्रवादीमुळे ती अधिकच प्रभावशाली बनली जाणार असल्याने खोतकर यांना प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय गत्यंतर नाही असे सूचित केले तरी वावगे ठरणार नाही.