दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. पक्ष संघटना सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून प्रयत्न केले जात आहेत.
त्यांनी राज्यभरामध्ये अनेक यात्रा काढल्या आहेत. ठाकरे गटाच्या या रणनितीला तोंड देण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या वतीनेही यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
आदित्य ठाकरेंनी मुंबईत निष्ठा यात्रा काढली होती, तर महाराष्ट्रात ‘शिव संवाद’ यात्रा. त्याचबरोबर ठाकरे गटाची ‘महाप्रबोधन’ यात्रा महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यातच आता ठाकरेंनी आणखी एका यात्रा सुरू केली आहे. ती म्हणजे शिवगर्जना यात्रा. ठाकरे गटाकडून काढला जात असलेल्या यात्रेविरोधात भाजप-शिवसेनेने नवीन रणनीती आखली आहे.
ठाकरे गटाने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय यात्रांचा मार्ग अवलंबला आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईतील बंडखोर आमदारांच्या विरोधात निष्ठा यात्रा काढली होती. तर मुंबई बाहेरील बंडखोर आमदारांविरोधात ‘शिव संवाद’ यात्रा काढली होती. आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.
उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. ठाकरे गटाने तालुका पातळीवर पोहोचण्यासाठी शिवगर्जना यात्रा सुरू केलेली आहे. असे असतनाच आता भाजप -शिवसेनेने एका यात्रेची घोषणा केली आहे. भाजप-शिवसेना ‘आशीर्वाद’ यात्रा काढून ठाकरेंना टक्कर देणार आहे.
भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेची घोषणा भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. भाजप-शिवसेनेची आशीर्वाद यात्रा उद्या (5 मार्च) पासून सुरु होणार आहे. ही यात्रा लोकसभा मतदारसंघातून काढण्यात येणार आहे. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, याच अनुषंगाने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एका प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाणार आहे. अशा सहा यात्रा काढल्या जाणार, असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
5 मार्च ते 9 मार्च आणि 11 मार्च या तीन दिवस प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात यात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर 14 मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य होणार, असल्याचीही माहिती शेलार यांनी दिली.