दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (मेळघाट) :- सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांचा होळी हा सर्वात महत्त्वाचा सण आहे.होळी पासून पंधरा दिवसांपर्यंत मेळघाटात अगदी धमाल वातावरण राहते. रोजगारानिमित्त बाहेर गेलेले आदिवासी बांधव आता होळीसाठी आपल्या घरी परतायला लागले असून होळीच्या तयारीला गावोगावी जोमात सुरुवात झाली आहे.
सर्वसामान्य प्रमाणे कॅलेंडरवर दर्शविलेल्या तारखेला सर्वत्र होळी साजरी केली जाते.मात्र;मेळघाटात प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी होळी साजरी केली जात असल्याची माहिती येथील रहिवाश्यांनी दिली.होळी कोणत्या दिवशी साजरी करायची हे गावातील प्रमुख ठरवतो असे ग्रामस्थांनी सांगतिले.आपल्या गावच्या होळीमध्ये लगतच्या गावातील रहिवासी तसेच सर्वांचे नातेवाईक सहभागी व्हावेत,या उद्देशाने प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी होळीचा सण साजरा करण्याची प्रथा आहे असे येथील ग्रामस्थ मंडळी सांगतात.
पंधरा दिवस अगोदरपासूनच होळी सणाकरिता प्रत्येक घरात तयारीला सुरुवात होते.घर शेणाने सारवले जाते तसेच घराला रंगरंगोटी केली जाते.रोजगारानिमित्त परप्रांतात गेलेली मजूर मंडळी होळीला आपल्या रोजगारातून मिळालेला पैसा घेऊन घरी परत येतात आणि आदिवासींचा सर्वात मोठा सण साजरा केला जातो.होळीला बाजारात आजुबाजूच्या गावातील कुटुंब खरेदी करण्यासाठी येतात.होळीनिमित्त लागणाऱ्या वस्तू तसेच नवीन कपडे आणि मुलांसाठी खेळणी या बाजारातून खरेदी केल्या जाते.
—————————————-
मेळघाटात होळी हा सर्वात मोठा सण म्हणून मानला जातो.ज्यामध्ये आदिवासी संस्कृतीची एक वेगळी झलक पाहायला मिळते.संपूर्ण मेळघाटतील नागरिकांनी एकजुटीने आणि उत्साहात होळी सण गेल्या दोन वर्षापासून साजरा केला नाही.मात्र;यावेळी सर्वजण होळीचा हा सण रंगतदार पद्धतीने साजरा करण्याची तयारी करताना दिसत आहेत.