दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / कंधार तालुक्यातील भूकमारी येथील ग्रामपंचायतच्या मालकीच्या हद्दीत अनेक ठिकाणी मोकळी जागा आहे ज्यावर फक्त ग्रामपंचायतची मालकी आहे. ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेची जतन व संरक्षण करणे ग्रामपंचायतच्या कार्यालयाचे अर्थात ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात कडक कार्यवाही करून सरपंच, ग्रामसेवकांची चौकशी करावी अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे निवेदनद्वारे ग्रामपंचायत सदस्यांनी केली.
गावठाणातील पूर्वेस टेकाळे यांचे घर पश्चिमेस रस्ता उत्तरेस नरोबा मंदिर व रस्ता दक्षिणेस प्रल्हाद वाडेकर यांची जागा आहे आहे. या चतुर सीमेच्या जवळ आतील मोकळी जागा ६० बाय ६० फूट ग्रामपंचायतच्या मालकीची आहे. सदर जागा यापूर्वी कोणाच्याच नावे नमुना नंबर ८ ला नोंद झालेली नाही असे असताना सदर जागेवर सरपंच सौ. शिवकांतबाई माधवराव अंदुरे यांचे नातेवाईक नागोराव शंकराराव आडकिने यांने अतिक्रमण केले आहे. ही बाब बेकायदेशीर आहे. गत काही महिन्यापासून सदर जागा नमुना नंबर ८ ला नोंदविण्यासाठी अर्जबाजारी सुरू आहे. अर्जासोबत कसलाही हस्तांतर अथवा मालकी बाबतचा पुरावा जोडलेला नाही असे असताना सदर जागेची कोणाच्या नावाने बेकायदेशीर नोंद केली जाऊ शकत नाही असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच ग्रामपंचायत कार्यालयाची जागा नमुना नं. ८ प्रमाणे ४३बाय ६६ फूट नोंदवलेली आहे असे असताना ग्रामपंचायतीच्या जागेच्या शेजारी असणाऱ्या बालाजी किशन दलाले आणि सखाराम किशन दलाले यांनी अतिक्रमण करून सदर जागेवर कच्चे व पक्के बांधकाम केलेले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असताना दीर्घकाळ ग्रामपंचायतवर कब्जा असलेल्या सरपंच शिवकांताबाई माधवराव अंदुरे यांच्या संहमतीने त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीची जागा बळकावली आहे. नागोराव अडकिने यांनी ग्रामपंचायतीकडे नमुना नंबर आठ ला नोंदविण्यासाठी वारंवार दबाव तंत्राचा वापर केलेला आहे या कृतीस सरपंच, ग्रामसेवकांची मूक संमती असल्याचे दिसून येते. सदर जागा खाजगी व्यक्तीच्या नावे लावण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे .
ग्रामपंचायतच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकाऱ्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. जर हे अधिकारी व पदाधिकारी मिळून ग्रामपंचायतच्या मालमत्तेचे नुकसान करत असतील तर ते कृत्य नियमबाह्य आहे. ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन करणारे आहे.
त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी. तसे या बेकायदेशीर कृत्यात त्यांचा सहभाग सरपंचाकडून ग्रामपंचायतच्या जागेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याप्रकरणी योग्य ती चौकशी करून विद्यमान सरपंच याच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ विश्वंभर पवार, जयश्री राजरत्न पवार यांनी केली आहे.