दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी येथे दीड लाख लोकसंख्येच्या तुलनेत परिसरातील शंभरच्या वर गावे जोडलेली आहेत.शहरातील भांडण तंटे बहुतेक वेळा पोलीस ठाण्याच्या पायरीवरच शांत होत असतात.अंजनगाव सुर्जी शहरातील शांतता-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मुख्य पोलीस स्टेशन सोडले तर काही वर्षांपूर्वी जुने बस स्टॉप येथे पोलीस चौकीचे निर्माण करण्यात आले होते.परंतु सद्या परिस्थितीत या भागातील पोलीस चौकी बंद अवस्थेत असल्यामुळे अवैध धंद्यांना उत आला आहे.परिसरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस चौकीची नितांत गरज असतांनाही ती बऱ्याच वर्षापासून कायमच बंद असल्यामुळे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.ही खोली नगरपरिषदच्या मालकीची असून तेथे मात्र पोलीस चौकी नावाचा बोर्ड तेव्हढा कायम आहे.खोली मात्र अनेक वर्षांपासून बंद आहे.
जेव्हा पासून ही पोलीस चौकी बंद झाली आहे तेव्हापासून गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावली असून एक ना एक घटना परिसरात घडत आहेत.या सर्वांना जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.बरेच वर्षांपासून बंद असलेली पोलीस चौकी सुरू करावी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
परिसरात आठवडीबाजाराच्या दिवशी येथे मोठी गर्दी असते.कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस चौकीची गरज आहे.ज्यामुळे परिसरातील अवैध धंद्यांना आळा बसेल व गुन्हेगारीवर वचक राहील.गेल्या अनेक वर्षांपासून येथील पोलीस चौकी बंद का बंद ठेवण्यात आली आहे?याचा उहापोह होणे गरजेचे आहे.पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालायला हवे.