दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- खासदार इम्तियाज जलील यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे . तसेच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना योग्य ती कार्यवाही करणेबाबत पत्राव्दारे कळविले आहे .
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिण्यात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार अतुल सावे व आमदार अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप पुतळा उभारण्याचे कामास सुरूवात करण्याची मागणी केली होती ; त्यांच्या मागणीला बैठकीतच खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध करुन पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी केली होती तसेच त्यासंबंधी पत्राव्दारे सुध्दा आज मागणी केली .
खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की , महाराणा प्रताप उदयपूर , मेवाड येथील शिशोदिया घराण्याचे महान राजा होते . त्यांच्या शौर्यामुळे आणि दृढनिश्चयामुळे त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर अजरामर आहे . ते लहानपणा पासूनच शूर , निर्भय , स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी होते . अनेक युध्दात त्यांनी पराक्रम दाखवून शत्रुंवर विजय प्राप्त केलेला आहे . अशा थोर , महान शुरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारुन काहीही साध्य होणार नाही .
महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळाच असेल ; कारण त्यांच्या पासुन प्रेरणा घेवून ग्रामीण भागातील युवक व युवती सैनिक शाळामधुन देश संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतली . सबब सैनिक शाळा मधून सक्षम आणि प्रशिक्षित लष्करी अधिकारी घडविण्याचे काम केले जाईल . सैनिक शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर , हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच तसेच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुध्दा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई , जिल्हाधिकारी व मनपा प्रशासक यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे .