दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
अक्कलकुवा तालुका हा अतिदुर्गम भागात व बहुतांश डोंगर दरीत वसलेला तालुका आहे.या तालुक्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती.येथील शेती ही पावसाच्या भरवशावर होणारी व कमी उत्पन्न देणारी शेती म्हणून सर्वदुर परिचित आहे.डोंगराळ परिसर व खडकाळ जमीन ही या परिसरातील खरी ओळख आहे.या जमिनीवर येथील शेतकरी बांधव वर्षांनु वर्षापासून पारंपारिक शेती कसत आले आहेत अतिदुर्गम भागात पारंपारिक पद्धतीने पारंपारिक भाताचे बियाणे फोकुन भाताची पेरणी केली जातेय मात्र बदलत्या काळात वेळोवेळी मिळत असणारे मार्गदर्शन आणि सुविधांमुळे मात्र आता काळानुरुप बदल होत असतांना दिसु लागलाय.थोड्या फार प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे अतिदुर्गम भागातील शेतकरी आता मात्र सुगंधित व अधिक उत्पन्न देणाऱ्या भाताच्या लागवडी कडे वळला आहे.दहेलचा काही परिसर तसेच ओघानी या परिसरात थेट मातीची चिखल मशागत करुन शेतकरी भाताच्या रोपांची लावणी करत आहे.या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता शक्य आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागोजागी भाताची लावणी करण्यात शेतकरी व महिला व्यस्त झाले आहेत.विशेष म्हणजे शेतकरी हे स्वतःच्या शेतातच भाताची रोपे तयार करीत आहेत.बदलत्या काळात सातपुड्याच्या शेतीत सातपुड्यातील शेतकऱ्यांनी काळानुरुप केलेला बदल सुखावणारा आहे.