दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन काहीच दिवस झाले, असं असताना यांच्यातील काही आमदार हे अक्षरश: महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटावा अशी भाषा करताहेत.
शिवसैनिकांना ठोकून काढा, हातपाय तोडा, हात तोडता नाही आलेत तर तंगडी तोडा, आरे ला कारे म्हणा, कोथळा काढा, ही काय पद्धत?’ असं म्हणत विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
कुठे शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र, कुठे आपले संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला. ज्यांनी नेहमी काम करत असताना कशा पद्धतीने आपण राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीने झाले पाहिजे, हे सगळ्यांना शिकवलं. त्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेल्या या महाराष्ट्रामध्ये तोडा, फोडा मारा ही पद्धत? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपला पटतं का?’ असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.
एका तर बहाद्दर विधायकाने, शिंदे गटाच्या आमदाराने सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं, म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला. तुम्ही स्वत: ला काय समजताय? सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय तुम्हाला?’ असं म्हणत अजितदादांनी शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संजय बांगर यांना फटकारलं आहे.
‘शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी, सर्वांना सविधान,कायदा नियम सारखेच. कायद्यापेक्षा सविधानापेक्षा, नियमापेक्षा कुणीही मोठा नाही. तो सरकारमधला असू द्या नाहीतर महाराष्ट्रातील कोणताही सर्वसामांन्य माणूस असू द्या’. असं अजितदादांनी म्हटलं आहे. ‘या पद्धतीची भाषा अजून कुठे सुरूवात झालेली नाही. यांना थांबवलं कसं जात नाहीत. यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याचं काम संबधितांचं नाही का?’ असा सवालही अजितदादांनी केला.