दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
जलसंपदा विभागाने सुरू केलेल्या कालवा अस्तरीकरणाच्या कामाविरोधात शेटफळ हवेलीतील शेतकरी आता मैदानात उतरणार आहेत. समितीकडून लवकरच शेटफळ येथे यासंदर्भात बैठीकेचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती शेटफळ हवेली चे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय (मामा) शिंदे यांनी दिली
जलसंपदा विभागाकडून कालवा अस्तरीकरणाच्या निविदा काढण्यात आल्या असून, हे काम लवकरच सुरू होणार आहे. गेल्या १४० वर्षांपासून कालवा वाहत असताना आताच विस्तारीकरणाची गरज का, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. कालवाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन होण्यासाठी पाणी वापर संस्थांवर लक्ष दिले, तरी पाणी बचतीचा उद्देश सफल होऊ शकतो. तरीही अस्तरीकरणाचा अट्टहास का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भात लवकरच निवेदन देऊन अस्तरीकरण रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
अस्तरीकरण झाले तर पाण्याचा पाझर पूर्णतः बंद होऊन जलसाठ्यांवर त्याचा परिणाम होईल. शेटफळ हवेली व आसपासचा परिसर फक्त कालव्यामुळे बागायती आहे. परिसरातील शेटफळ,भोडणी,वकीलवस्ती,बावडा,सराटी आदी गावे याच पाण्यावर अवलंबून आहेत. अस्तरीकरण झाल्यास अनेक गावांतील बोअरवेल्स, चारी, विहिरींचे पाणी कायमस्वरुपी जाईल. शेकडो हेक्टरवरील उसाची शेती धोक्यात येईल.
शेटफळ हवेली येथील तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव आहे,या तलावासाठी शेटफळ हवेलीतील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे, आणि या शेतकऱ्यांवर अन्याय कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा संजय (मामा) शिंदे यांनी दिली आहे.जर आपणास अस्तरीकरण करायचे असेल तर शेटफळ हवेलीतील कालव्याची हद्द सोडून करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी केली आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होईल, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय असे शेती आधारित उद्योग संकटात येतील. वन्यजीव व झाडे नष्ट होतील. शेतमजूर, व्यापार, अर्थकारणावर परिणाम होईल. शेतकर्यांनी कोट्यवधी रुपये खर्चून कालव्यालगत खोदलेल्या विहिरी, पाईपलाईन यांचा खर्च वाया जाऊन त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे अस्तरीकरणामुळे अनेकांचे बळी जातील,अशी भीती संजय (मामा) शिंदे यांनी व्यक्त केली आहे.