दैनिक चालु वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/गंगाखेड : कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष्य केंद्रीत न करता सततची हप्ते वसूली आणि केवळ दिखाऊपणाच्या बैठकी कशाला घेतात, असा घणाघाती आरोप करताच आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यावर जिल्ह्यातले वरिष्ठ पोलीस अधिकारी एकदम तुटून पडले. सार्वजनिक ठिकाणी केलेली टीका पूरती वर्मी लागली असावी म्हणूनच चीडलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात चांगलीच तू-तू, मै-मै झाली. गणेशोत्सव महोत्सवा दरम्यान कोणतीही शांतता भंग होऊ नये यासाठी बोलावलेल्या बैठकीत कर्तव्याची बूज राखणाऱ्यांकडूनच शांतता भंग झाली असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महोत्सव काळात
सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली जावी, कुठेही आणि कोणीही शांतता भंग करु नये यासाठी प्रिएंटीव्ह ॲक्शन म्हणून सलग दुसऱ्यांदा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. रत्नाकर गुट्टे हे सुध्दा सतत लोकसेवेत व्यस्त राहात असावेत. म्हणून की काय, सारखे सारखे नावापूरत्या बैठका लावून सगळ्यांचाच किमती वेळ वाया घालविण्यापेक्षा हप्ते घेणे बंद करा नि कर्तव्यावर लक्ष द्या, म्हणजे सर्व काही ठिक राहील. कदाचित असंही त्यांना वाटलं असावं ? तथापि सार्वजनिक ठिकाणी केलेला आरोप कांही अंशी योग्य असेलही, परंतु तसा लोकप्रतिनिधींनी तरी करणे संयुक्तिक ठरु शकते का, हा खरा सवाल आहे. त्याचाच परिपाक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेणीक लोढा, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांना कमालीचा राग आला असावा, त्यामुळे त्यांची आपसात खडाजंगी झाली. परिणामी शांतता भंग होण्यापर्यंत ते प्रकरण गेले. त्यामुळे बैठकीला उपस्थित विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, समाजसेवक, नागरिक यांच्यात एकच खळबळ माजली गेली.
दरम्यान याच खडाजंगीचे लोण जिल्हा व तालुका तर सोडाच परंतु गावागावात पोहोचले जाऊ शकेल, हे सुध्दा नाकारता येणार नाही एवढे मात्र खरे.