दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : ‘बाळासाहेबांचा मुलगा .. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्ष ब्लॅकमेल करणार आहात. शरद पवारांच्या मांडीवर बसलात तेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची आठवण झाली का ?
असा सवाल करत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट मातोश्रीवरच हल्लाबोल केला आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटात सामील झाल्यानंतर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच थेट मातोश्रीवरच हल्लाबोल केला आहे. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे .
उद्धव ठाकरे अजून किती दिवस बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना ब्लॅकमेल करणार आहात. आता महाराष्ट्र दौरा करत आहात. त्यानंतर मी पण महाराष्ट्र दौरा करणार लोकांना नेमकी वस्तुस्थिती महाराष्ट्राला सांगणार आहे. उद्धवजींना जे मिळाले ते बाळासाहेबांचा मुलगा म्हणून आणि आदित्यला मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून पण पक्ष संघटना आम्ही वाढवली.
आता सगळ्यांना भेटीगाठी सुरू आहेत मग गळ्या अडीच वर्षात काय आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी भावनात्मक डायलॉग बाजी थांबवावी’, असंच रामदास कदम म्हणाले. (नारायण राणेंनी केली आदित्य ठाकरेंची उंदराशी तुलना, गणेशोत्सवात होणार ‘शिमगा’?) ‘महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षात केवळ तीन वेळा मंत्रालयात आले, कोकणात वादळ आले, अस्मानी संकट आले तेव्हा कोकणवासीयांची अश्रू पुसायला त्यांना वेळ नव्हता, शरद पवारांसारख्या नेता कोकणात आला मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अश्रू पुसण्यासाठी कोकणात आले नाहीत. आता बाप बेटे बाहेर पडले.
मातोश्रीचे दरवाजे सताड उघडले. आता पदांची खिरापत वाटप करण्याचे काम सुरू केले आहे. या आधीच जर आमदार खासदारांना वेळ दिला असता भेटला असतात तर आज ही वेळ आली नसती. अजित पवार जेव्हा शिवसेनेच्या आमदारांना संपवत होते तेव्हा आमदारांचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीकाही कदम यांनी केली.
विनायक राऊत यांची कवडीची किंमत नाही त्यांच्या विषयी आपण काय बोलणार ? यांची औकात आहे का? विनायक राऊत यांच्या प्रचाराला कणकवलीला मी जात होतो. शेवटच्या सभा मी घेत होतो, त्यांच्यावर बोलण्यासाठी त्यांची औकात नाही. चार आमदार नाही एक आमदार फोडून दाखवं, आहेत ते सांभाळा आधी पहिल्यांदा असं म्हणत रामदास कदम यांनी राऊत यांच्यावर टीका केली.