दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:बिलोली तालुक्यातील सगरोळी, बोळेगाव या नदीघाटावर साठा करून ठेवलेल्या रेतीची ओव्हरलोड वाहतूक होत आहे. शहरातील तहसील कार्यालय व उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरून ही वाहतूक होत असताना सुद्धा याकडे संबंधित विभागाकडून डोळे झाक केले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देगलूर तालुक्यासह बिलोली तालुक्यातील अनेक रेती घाटांचा लिलाव फेब्रुवारी मार्चमध्ये करण्यात आला होता. या लिलाव प्रक्रियेनंतर रेती माफीयांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून नियमबाह्यरित्या मोठ्या प्रमाणावर रेती उपसा केला. मिळालेल्या परवानगीपेक्षा अनेक पटीने रेतीचे उत्खनन केले होते. यानंतर सुद्धा रेती माफीयांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून सगरोळी,बोळेगाव या घाटावरील रेती रेकॉर्डला शिल्लक असल्याचे दाखवत डम्पिंग माल नदीबाहेर आणून साठे ठेवण्यात आले होते.
विशेष म्हणजे त्यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आलेले पंचनामे हैं पूर्णतः बोगस करण्यात आले होते.
कर्नाटक राज्यातील औराद येथील एक रेतीमाफीया स्वतःच्या मालकीच्या असलेल्या अनेक वाहनातून रात्रंदिवस शासनाने घालून दिलेल्या नियमांची ऐसी की तैसी करीत क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड रेती वाहतूक करीत आहे. विशेष म्हणजे ही ओव्हरलोड रेती वाहतूक तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरूनच होत असतानासुद्धा संबंधित कार्यालयाकडून डोळेझाक केले जात आहे. या रेती माफीयाकडून रेती वाहतुकीसाठी असलेले टोकन है सोलापूर, पुणे, बार्शी, इंदापूर असे खोटे लांब पल्ल्याचे ठिकाण टाकले जात आहे. हाणेगाव परिसर किंवा औराद येथे रेती खाली करून त्याच टोकनवर पुन्हा दोन ते तीन ट्रिप मारून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलून पथकाची निर्मिती करून या ओव्हरलोड रेती वाहतुकीवर नियंत्रण आणणे गरजेचे बनले आहे.