दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : काँग्रेसमधील एका मोठ्या नेत्यासह पक्षातील आमदारांचा एक गट सरकारमधील भाजपत जाणार असल्याच्या चर्चेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे.
काँग्रेस छोडो मोहीम भाजपकडून सुरू आहे का? या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले, भाजप थेट कृती करतं, असं सांगितलं. त्याचबरोबर शिल्लक राहिलेली काँग्रेस वाटून घेऊ असं ते म्हणाले.
शिंदे म्हणाले सदिच्छा भेट, नारायण राणे म्हणाले निर्णयाबद्दल अभिनंदन करायचं होतं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही सदिच्छा भेट होती असं सांगितलं. राजकीय चर्चा झाली नाही. जुन्या आठवणी निघाल्या. मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीतील अनुभवांबद्दल चर्चा झाली, असं शिंदे यांनी सांगितलं.
शिंदे यांच्या उत्तरानंतर नारायण राणे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी घेतलेला एक निर्णय मला आवडला. मागील अडीच वर्ष असलेलं सरकार घरी पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तो मला खूपच आवडला. त्यामुळे मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी बोलावलं होतं, असं राणे म्हणाले.
दोन दिवसांपासून काँग्रेसमधील एक गट सरकारमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झालीये. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘काँग्रेसबद्दल मी बोलत नाही. सभागृहात मी बोललो आहे. त्यांची जी काय फरफट सुरूये, ती आपण पाहतोय. कुणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाहीये.”
“आम्ही जनतेच्या मनातील भावना जागृत केली. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं. लोकांच्या मनात जे होतं, तो निर्णय आम्ही घेतला. बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय. काँग्रेसचे नेते सरकारमध्ये येणार असल्याचं मला माहिती नाही”, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं
याच मुद्द्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “काँग्रेसमधून काँग्रेसवाले म्हणून येत नाहीयेत. ते त्यांच्या शिवसेनेत येत आहेत. ते शिवसैनिक होणार. ते उलट चांगलं काम करत आहेत. एक तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील नाहीतर भाजपत येतील. जी काँग्रेस शिल्लक राहिलेली आहे, ती आम्ही वाटून घेऊ”, असं केंद्रीय नारायण राणे म्हणाले.