दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
रांची : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या आघाडी सरकारने सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला. दुसरीकडे विरोधी भाजप आमदारांनी विधानसभेत ठरावावरील मतदानापूर्वीच सभात्याग केला.
गेल्या काही दिवसांपासून झारखंडमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. सत्ताधारी आघाडीचे आमदार काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमधून विशेष विमानाने रविवारी रात्री राजधानी रांचीत दाखल झाले. छत्तीसगडमध्ये त्यांना आलिशान रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. रांचीत आल्यानंतर हे आमदार राज्य अतिथिगृहात एकत्र राहिले. तेथून मंगळवारी त्यांना थेट सभागृहात नेण्यात आले.
या पार्श्वभूमीवर ८१ सदस्य असलेल्या विधानसभेत तब्बल ४८ सदस्यांनी सोरेन सरकारला एकमुखी पाठिंबा दर्शविला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. सोरेन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलाविले होते. ठरावात अनुकूल कौल लागल्यानंतर सोरेन यांनी भाजपसह आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्यावरही आरोप केले. सरमा हे झारखंडचे आमदार विकत घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजप आमदार घोषणाबाजी करीत असताना सोरेन म्हणाले की, विरोधकांनी लोकशाहीचा नाश केला आहे. भाजप आमदारांच्या घोडेबाजारात सामील आहे. आम्ही सभागृहात आमची ताकद सिद्ध करून दाखवू. देशात राष्ट्रपतीपदी पहिल्या आदिवासी व्यक्तीला संधी दिल्यानंतर भाजप एका आदिवासी मुख्यमंत्र्याचे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे.
झारखंड बलाबल – एक मत कमी पडले
८१ – विधानसभेतील एकूण संख्या
३० – झारखंड मुक्ती मोर्चा
१८ – काँग्रेस
१ – राष्ट्रीय जनता दल(आघाडी)
२६ – भाजप
आपले राज्य नसलेल्या झारखंडसह इतर राज्यांतील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपच्या कारवाया सुरु आहेत. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव मांडण्याची गरज निर्माण झाली होती. निवडणूका जिंकण्यासाठी भाजप देशात दंगलींना चिथावणी देऊन यादवी युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.
– हेमंत सोरेन, झारखंडचे मुख्यमंत्री