दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: बाप्पा गेल्यावर गणपती दर्शन संपेल त्यामुळे आता बळीराजाला मदत मिळायला हरकत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
आज राज्यभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत आहेत. कोरोना संकटामुळे जवळपास दोन वर्षांपासून न निघालेल्या विसर्जन मिरवणुका यंदा जल्लोषात सुरु आहेत. अनेक राजकीय नेतेमंडळी देखील विसर्जन मिरवणुकीला भेट देत आहेत.
याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘यंदा हिंदू सर्व सण उत्साहात साजरे होत आहेत. ते कोरोनाचे विघ्न टळल्यामुळे साजरे करत आहेत. तसंच बाप्पा निघाले आहेत, महाराष्ट्रात अधिक सौख्य भरभराटी राहो, गणराया बुध्दीचा देवता आहे, त्याच्याकडून सर्वांना सुबुद्धी मिळो अशी मागणी त्यांनी गणरायाला केली.
यावेळी बोलताना पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला, अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूर आला आहे, अजूनही शेतकऱ्यांना सरकारची केवळ घोषणा झाल्या पण, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. शिवाय आता गणपती बाप्पा निघालेत, गणपती दर्शन संपेल त्यामुळे बळीराजाला मदत मिळायला हरकत नाही असा टोला त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
गणेशोत्सव सुरु झाल्यापासून मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधील गणेश मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. त्यांनी जवळपास १५० ते २५० गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या. गणेश दर्शनासाठी ते पुण्यात देखील आले होते. त्यांच्या या गणेश मंडळांना भेटी देण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. अशातच आता जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.