दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जालना– तुम्ही खरेच हिंदुत्ववादी असाल आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे असाल तर ,एकदा जांब समर्थ या आणि तपास यंत्रणेला आदेश द्या! असे आव्हान जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
======================
समर्थ रामदास स्वामी ज्या श्रीरामाच्या पंचायतनाची पूजा करत होते ते सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे पंचायतन मागील महिन्यात चोरीला गेले आहे. अद्याप पर्यंत पोलिस यंत्रणेला याचा तपास लागलेला नाही.
==========================
दरम्यान एक सप्टेंबर रोजी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे जाऊन चोरी विषयी माहिती घेतली आणि याचा तपास गणेश विसर्जनापर्यंत लागला नाही तर आपण आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार कैलास गोरंट्याल यांनी परिवारासह ठिय्या आंदोलन देऊन लाक्षणिक उपोषण केले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आमदार गोरंट्याल यांनी सांगितले की, सध्या आपल्याकडे लंपी या जनावरांच्या आजाराची लागण सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर जनावरांना मुकावे लागले तर शासनाकडे जनावरांच्या बदल्यात जनावर किंवा आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.आजच्या या आंदोलनाला माजी नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल, अमित कुलकर्णी, फकीरा वाघ, यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती