दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : लावणीसम्राज्ञी गुलाब बाई संगमनेरकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे.
पुण्यात राहत्या घरी आज १४ सप्टेंबर २०२२ रोजी, दुपारी १२.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली,नातवंड,जावई असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा त्यांची लावणी परंपरा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका साकारत होता. आता त्यांची मुलगी लावणीसम्राज्ञी वर्षा संगमनेरकर आईची लावणी परंपरा पुढे नेत आहेत. गुलाब बाईंच्या आकस्मित निधनानं लोककलेच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
लावणी परंपरेतल्या गुलाब संगमनेरकर एक वटवृक्ष होत्या. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या घरात लावणी परंपरा असल्याकारणाने त्यांना लहानपणापासूनच लावणीची गोडी लागली. गुलाबबाईंनी लालबागच्या हनुमान थिएटरमध्ये काही दिवस लावणीची सेवा केली.त्यानंतर ढोलकी फडाच्या तमाशातून अनेक कार्यक्रम केले. संगीतबारी हा त्यांच्या परंपरेचा प्राकृतिक पिंड, परंतु जेव्हा तमाशा बंद असेल तेव्हा त्या संगीतबारी करायच्या. नंतर नंतर गुलाबबाईंनी लावणीला एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण करुन दिली. लावणीला त्यांनी कथ्थकची जोड दिली. शास्त्रोक्त लावणी त्यांनी केली.
गुलाबबाईंनी ऐन तारुण्यात महाराष्ट्र गाजवला, परंतु त्यांची खरी कारकीर्द घडली ती खानदेशात. एक जमाना होता बाईंना खानदेशची लावणीसम्राज्ञीच म्हटलं जायचं. जवळजवळ पस्तीस-चाळीस वर्षं गुलाबबाईंकडे खानदेशच्या लावणीकलेची सत्ता होती. म्हणून तर लता मंगेशकरांनी जेव्हा तीसेक वर्षांपूर्वी ‘आजोळची गाणी’ असा अल्बम केला, तेव्हा ‘राजसा जवळी जरी बसा, जीव हा पिसा’ या बैठकीच्या लावणीवर भावकाम आणि अदा करण्यासाठी गुलाबबाईंना बोलावण्यात आलं होतं.
बैठकीची लावणी म्हणजे गुलाबबाईंच्या डाव्या भुवईचा खेळ… लावणी स्वतः म्हणणं नि तिच्यावर अदा करणं, हे बैठकीच्या लावणीचं कसब आणि त्यात गुलाबबाई माहीर आहेत. ते साहजिकही आहे, कारण बैठकीच्या लावणीचं त्यांचं घराणं गोदावरीबाई पुणेकरांचं आहे. त्यामुळे गाण्यापासून भावकामापर्यंतचा सारा थाट न्यारा! गोदावरीबाईंनी लहानपणी थोड्या काळाकरता का होईना पण जे शिकवलं, ते गुलाबबाईंनी आपल्यात रुजवलं आणि वाढवलं देखील. महत्त्वाचं म्हणजे, त्यात त्यांनी स्वतःचीही अधिकची भर घातली. गुलाबबाई या विचारी कलावंत आहेत, बैठकीच्या लावणीचं त्यांचं असं एक स्वतःचं सौंदर्यशास्त्र आहे. त्यामुळेच ठाय लयीतली बैठकीची लावणी सादर करताना आजवर, ना कधी त्यांचा दमसास गेला, ना अदेवरचा त्यांचा तोल ढळला!
==========================
गुलाब बाईंना दोन वर्षापूर्वीच म्हणजे कोव्हिड अगोदर महाराष्ट्र शासनाने ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर’ यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आलं होतं.
=========================
गुलाब बाईंच्या गायकीची ढब, नृत्य,अदा हे एकत्रित कोणा कलाकारात मिळत नाही, पण त्या मात्र अपवाद होत्या. त्यांच्यात या सर्व कला ठासून भरल्या होत्या. अशा सर्वगुणीसंपन्न कलाकार गुलाबबाई संगमनेरकर आपल्यातून निघून गेल्या याचं दुःख आहेच,पण त्यांनी मागे ठेवलेला लावणीचा अमूल्य ठेवा पुढील कैक पिढ्यांना कलेची उपासना करण्याचा योग्य मार्ग दाखवून जाईल एवढं मात्र निश्चित.