दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : सोनी टीव्हीचा रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १४ ला पहिला करोडपती मिळाला आहे.
होय, महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावलाने एक कोटी रुपये आपल्या नावावर केले आहेत. मात्र, कविताने ७ कोटी रुपये जिंकले की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कविता याआधीही ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाली होती. पण शोमध्ये सहभागी झालेले ही स्पर्धक हॉटसीटवर बसू शकली नाही. पण तिने हार न मानता पुन्हा प्रयत्न केला आणि १ कोटींची विजेती झाली.
४५ वर्षीय कविताने सुरुवातीपासूनच एक कोटी रुपये जिंकायचेच होते. अमिताभ बच्चन यांनीही तिच्या आत्मविश्वासाची खूप प्रशंसा केल्याचे बोलले जात आहे. कविता तिचा मुलगा विवेकसोबत शोमध्ये सहभागी झाली होती. येत्या सोमवार आणि मंगळवारी हा एपिसोड सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
गेल्या सीझनपासून ‘कौन बनेगा करोडपती’च्या सीझनमध्ये महिलांचा बोलबाला आहे. गेल्या दोन सीझनमध्ये अनेक महिला करोडपती झाल्या आहेत. याचा आनंद अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केला आहे. ‘करोडपती होण्याचे स्वप्न घेऊन देशभरातील चाहते या शोमध्ये सहभागी होतात. एवढी मोठी रक्कम जिंकणे प्रत्येकाला जमत नसले तरी लाखोंमध्ये पैसे जिंकून अनेकजण आपली स्वप्ने काही प्रमाणात पूर्ण करू शकतात’. असे बिग बी या शोमध्ये बोलले होते.
गेल्या १३ सीझनमध्ये केबीसीच्या नियमांतर्गत एक कोटी जिंकल्यानंतर, ७ कोटींच्या प्रश्नाला चुकीचे उत्तर दिल्यावर स्पर्धकांना ३ लाख रुपये मिळत होते. यामुळेच ७ कोटींच्या प्रश्नाला एकही स्पर्धक उत्तर देत नव्हता. मात्र, आता या सीझनमध्ये ७ कोटींच्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने स्पर्धकांना ७५ लाख रुपये मिळणार आहेत. निर्मात्यांना आशा आहे की यामुळे काही स्पर्धक ७ कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. मात्र, या प्रश्नासाठी कोणतीही लाईफलाइन वापरण्याची परवानगी नाही.