दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
मूल शहरातील मालधक्का तातडीने हलविण्यात येईल, हा मालधक्का मूल शहरापासून दूर हलविण्याचे निर्देश त्वरीत देण्यात येतील,जेणे करुन शहरातील नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार नाही ,अशी ग्वाही चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
उपरोक्त मागणी संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांच्या एका शिष्टमंडळाने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात मूल तालुका भाजपाध्यक्ष संध्याताई गुरनुले, शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी उपाध्यक्ष नगर परिषद नंदू रणदिवे, प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार यांनी पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले व मालधक्का त्वरीत हटविण्याची मागणी केली. मुल शहरातील प्रदुषणाच्या प्रश्नाच्या दृष्टीने मालधक्का हा अतिशय घातक असल्याचे भाजपा पदाधिका-यांनी चर्चेदरम्यान विशद केले. या मालधक्क्यामुळे मुल शहरात वाहनांचे आवाजाही मोठया प्रमाणात वाढणार आहे. ज्यामुळे अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढण्याची शक्यता आहे. असेही शिष्टमंडळाने पुढे नमूद केले. या सर्व बाबींची दखल घेत हा मालधक्का शहरातून बाहेर हलविण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी या शिष्टमंडळाला दिली.