दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे दि.६: राज्य शासनाच्या कृषि विभागातर्फे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेच्या दुसऱ्या सत्रात नैसर्गिक शेतीच्या अनुशंगाने विविध विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत केलेल्या प्रयोगाबाबत माहिती देत आपले अनुभव विषद केले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित परिषदेला कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते.
नैसर्गिक शेती करताना शासकीय योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या अर्थसहाय्याबाबत कृषि उपसंचालक आरिफ शाह यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीबाबत त्यांनी विदर्भात सुरू असलेल्या व्यवस्थेबाबत माहिती दिली.
प्रगतीशील शेतकरी दीपक नरवडे यांनी जीवामृत व गोकेंद्रित उत्पादनाबाबत तसेच शेतकरी रामहरी कदम यांनी पंचगव्य तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप ही पाच गव्य आहेत, यामध्ये शेण व गोमूत्र शेतीसाठी कसे महत्त्वाचे आहेत तसेच जीवामृत बनविताना काय काळजी घ्यावी याबाबत त्यांनी माहिती दिली.
कृषि शास्त्रज्ज्ञ संतोष चव्हाण यांनी शेतीच्या बांधावरील प्रयोगशाळेबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधाला. जैविक अर्क निर्मिती तंत्रज्ञान, नैसर्गिक खते व निविष्ठा बनविताना कसे बनवावे, जमीनीची सुपिकतेसाठी काय करावे याबाबत त्यांनी माहिती दिली.
श्री. प्रशांत नायकवाडी यांनी नैसर्गिक शेती प्रमाणीकरणाबाबत माहिती दिली. शेतीमाल निर्यातीसाठी प्रमाणीकरण महत्वाचे असल्याचे सांगून प्रमाणीकरण संस्था तसेच याबाबतच्या प्रक्रियेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
नांदेड येथील प्रगतीशील शेतकरी विश्वनाथ होळगे व पुणे येथील गुलाब घुले यांनी मनोगत व्यक्त केले. नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.