दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : आगामी टी-20 विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय वरिष्ठ खेळाडूंचा संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वातील युवा खेळाडूंचा संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे.
धवनच्या नेतृत्तावातील संघात शुबमन गिल, रजत पाटीदार, ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी अशा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. पण संघात पृथ्वी शॉ याचे नाव मात्र नाहीये. संघाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे शॉ देखील निराश आहे आणि तो आता पहिल्यांदाच याविषयी व्यक्त देखील झाला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील मुंबई संघाचा महत्वाचा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. पण तसे होताना दिसले नाही. शॉने नुकतीच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनातील नाराजी बोलून दाखवली. यावेळी त्याने सांगितल्यानुसार, तो खूप मेहनत करत आहेत, धावा करत आहे, पण त्याला संधी मात्र मिळत नाहीये. त्याला संधी मिळाली, तर तो चांगल्या प्रदर्शनासाठी प्रयत्न करेल.
माध्यमांशी बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला, “मी निराश झालो होतो. मी धावा करत आहे, खूप मेहनतही करत आहे, पण संधी मिळत नाहीये. पण ठिक आहे, जेव्हा त्यांना (निवडकर्त्ये) वाटेल की मी तयार आहे, तर ते मला खेळवतील. मला जी संधी मिळेल, मग ती भारत अ संघासाठी असो किंवा दुसऱ्या कोणत्या संघाकडून. मी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि स्वतःच्या फिटनेस कायम ठेवेल.”
मी माझ्या फलंदाजीत वेगवेगळ्या गोष्टींबर काम केले नाहीये, पण फिटनेसवर खूप काम गेले आहे. मागच्या आयपीएलनंतर वजन कमी कऱण्याचे कामही केले आहे. यादरम्यान सात ते आठ किलो वजन मी कमी केले. जिममध्ये मी खूप वेळ घालवला. खूप धावलो, सर्व प्रकारच्या मिठाई आणि कोल्ड ड्रिंक बंद केल्या. चायनिय जेवण मी माझ्या मॅनूमधून पूर्णपणे बाहेर केले आहे,” अशी माहितीही शॉने यावेळी दिली.