दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
रस्त्यावरील खड्ड्यांनी कहर केला असून वाहनांच्या अपघातासोबत वाहने जाग्यावर नादुरूस्त होण्याचे प्रकार होत आहेत.
लातूर : लातूर ते बार्शी जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. लातूर सोडल्यापासून सुरू होणारा खड्ड्यांचा संघर्ष टेंभूर्णीपर्यंत सुरू असतो.
यात लातूर ते मुरूड दरम्यानच्या खड्ड्यांमुळे वाहने व बसगाड्या जाग्यावरच बंद पडण्याचे प्रकार वाढले असून अनेकांनी पर्यायी व छुप्या मार्गाचा अवलंब सुरू केला आहे.
लोकप्रतिनिधींसाठी हा रस्ता महत्वाचा असून रस्त्यासाठी काम करणारे अधिकारीही याच भागातील असूनही त्यांची गत आपलेच दात आपलेच ओठ अशी झाली आहे. रविवारी (ता. ३०) मुरूड पोलिसांनी काही भागातील खड्डे वीटांचे तुकडे टाकून बुजवत वाहनचालकांना दिलासा दिला.
या रस्त्यावर देशात नावाजलेला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे. यासोबत माजीमंत्री अमित देशमुख हे संस्थापक अध्यक्ष असलेला विलास सहकारी साखर कारखाना आहे. यामुळे ऊस वाहतुकीसाठी रस्ता महत्वाचे आहे.
आमदार धीरज देशमुख यांच्या लातूर ग्रामीण मतदारसंघातील हा सर्वात मोठी वाहतुक असलेला रस्ता आहे. रस्त्याचे एवढे महत्व असतानाही सर्वांचे याकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत. दरम्यान आता ऊसतोड सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील खड्डे आपोआप बुजले जातील, असा उपरोधिक सुरही प्रवासी तसेच चालक आवळत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी हे मुरूड येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडूनही रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याने `आपलेच दात आणि आपलेच ओठ` अशी अवस्था या भागातील लोकांची झाली आहे.
दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांनी कहर केला असून वाहनांच्या अपघातासोबत वाहने जाग्यावर नादुरूस्त होण्याचे प्रकार होत आहेत. यात बसगाड्यांची संख्या मोठी आहे. खड्डे बुजवण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याने रस्त्यावरील करकट्टा ते मुरूड दरम्यानचे खड्डे रविवारी मुरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी महेश पवार, बाबासाहेब खोपे व सचिन राठोड यांनी वीटांचे तुकडे टाकून बुजवले.
लातूरपासून विमानतळ चौकापर्यंत रस्त्यावर खड्ड्यांची श्रृंखला आहे. त्यानंतर सहा किलोमीटरच्या नव्याने झालेल्या चौपदरी रस्त्याचाच केवळ दिलासा असून त्यानंतर मुरूड अकोलाच्या पुढे खड्डेच खड्डे आहेत. वाहनचालकाची ओरड असताना महामार्ग विभागाने चाँदपीर दर्गाच्या अलीकडील केवळ दहा ते बारा खड्डे मुरूम टाकून तात्पुरते बुजवले आहेत.
उर्वरित हजारो खड्डे तसेच आहेत. रामेगाव पाटीच्या पुढे खड्ड्यात टाकण्यासाठी आणलेला मुरूमाचा ढिगारा तसाच रस्त्यावर पडून आहे. खड्डे कधी बुजले जाणार, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. कार्यकारी अभियंता स्वामी यांनी दिल्ली येथून निधी आल्याशिवाज खड्डे बुजवणे अशक्य असल्याचे सांगत हतबलता दर्शवली.
या रस्त्यावरील खड्ड्यांना वैतागून अनेकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब सुरू केला आहे. मुंबई व पुण्याला जाणाऱ्यांनी सोलापूरमार्गाचा आधार घेतला असून यामुळे रस्त्यावरील वाहतुकीत घट झाली आहे. खासगी बसही मोठ्या संख्यने सोलापूरमार्गेच धावत आहेत.
यात उड्डाणपुलापासून लातूरकडे येणाऱ्या वाहनांनी पर्यायी विलासराव देशमुख मार्गाचा आधार घेतला असून त्यावरून ऑटोरिक्षा व अन्य वाहने धावत आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्याही खोल गेल्या असून वाहनचालकांना खड्ड्यांतून पुढे जाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. यामुळे खड्ड्यांसोबत साईडपट्ट्याही बुजवाव्यात, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.